Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुटकेचा निश्वास! मुंबई, पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी सुधारली

Air quality
, शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (20:30 IST)
मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरुवारी) मुंबईसह उपनगरांत आणि पुण्यातील काही भागांत कोसळलेला पाऊस फायदेशीर ठरल्याची माहिती मिळत आहे. काल झालेल्या पावसामुळे मुंबई आणि पुणे हवा गुणवत्ता पातळीत समाधानकारक श्रेणीत आले आहेत. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) 94 वर तर पुण्यातील 82 वर आहे.
 
मागील अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत दिसत होती, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं होतं. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महापालिका आणि एमपीसीबीकडून विविध उपाययोजना, ज्याचा देखील परिणाम हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा होण्यास पाहायला मिळाला. तर, पुढील 48 तास मुंबईतील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा दिसेल. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा त्यात भर पडत प्रदूषित वातावरण दिसू शकतं, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
 
राज्याचा श्वास कोंडला. प्रदूषणाने सर्वच शहरं हैराण झाली आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत. बांधकाम साईट्सवर स्मॉग गन स्प्रिंकलर्स लावा, एमएमआरडीएच्या बांधकाम साईट्स धूळमुक्त करा, शहरात झाडांची जास्तीत जास्त लागवड करा, रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबईत विशेष पथकं तयार करा, वॉटर टँकरची संख्या वाढवा, मुंबईतले रस्ते पाण्याने धुवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मुंबईत तातडीनं याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र प्रदूषणाची समस्या मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. विविध महापालिकांनीही आता हा विषय गांभीर्यानं घेत तातडीनं उपाययोजना केल्या आहेत.
 
मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी:
मुंबई उपनगरात अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप , मुलुंड, गोवंडी अशा सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. या अवकळी पावसानं मुंबईकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे दिवाळी साठी खरेदीला किंवा भेटी गाठी घेण्यास बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र केसरी: अखेर पैलवान सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी