Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण : पीहू

चित्रपट परीक्षण  : पीहू
, शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (11:43 IST)
सिनेमा हे केवळ स्वप्नरंजनाचे साधन नसून ते दाहक वास्तव दाखवणारे एक सशक्त माध्यम आहे; हे दिग्दर्शक विनोद काप्री याला चांगलेच उगले आहे. मूळचा पत्रकार आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर  असल्यामुळे सिनेमाच्या चौकटीत नेमके काय दाखवायचे; याचे अचूक समीकरण त्याला गवसले आहे असे नक्कीच म्हणता येईल. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणार्‍या विनोद काप्री याने त्याच्या आजवरच्या कामाला साजेसेच का 'पीहू'च्या माध्यमातून केले आहे. 'वेळ आली होती, पण काळ नव्हता' ही म्हण वेळोवेळी सिनेमा पाहताना तुम्हाला नक्कीच आठवेल. एका बंद खोलीत घडणारी 'पीहू'ची गोष्ट रोमांचक आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे, असेही निर्मात्यांकडून सांगण्यात आले असल्यामुळे सिनेमाचा प्रभाव तुमच्यावर अधिक पडतो. बॉलिवूडपटांमध्ये अशा एका खोलीत घडणार्‍या सिनेमांच्या कथा तशा कमी आहेत. त्यातही एखाद दुसराच सिनेमा प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर छाप पाडतो. 'पीहू'मधली नाट्ययता दोन वर्षीय मुलीभोवती फिरत असल्यामुळे ती अधिक रोमांचक  आणि अंगावर काटा आणणारी आहे. त्यामुळे आजच्या मसालेपटांच्या भाऊगर्दीत निश्‍चितच काहीतरी वेगळे पाहाण्याचे साधान 'पीहू' तुम्हाला देतो.
 
या कथेची पार्श्वभूमी आहे; ती एका तरुण जोडप्याची. जे आपापसात सतत भांडत असतात. आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीदेखील पती अर्थात गौरव घरी उशिराने येतो. त्याचं पत्नी पूजासोबत भांडण होते. पूजा रोजच्या भांडणाला कंटाळून झोपेच्या गोळ्या खाऊन आत्हत्या करते. गौरव दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर कामानिमित्त कोलकाताला जायला निघतो. या सगळ्यात गौरवच्या नकळत घरात पीहू (मायरा विश्वकर्मा) एकटी असते. सकाळी, पीहू झोपेतून उठल्यावर पलंगावर असलेल्या तिच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करते. आपली आई अजून झोपली आहे; असेच त्या चिमुकलीला वाटत असते. विमानतळावरून पीहूचे वडील पूजाला मोबाइलवर फोन करतात. मोबाइल वाजतोय हे समजल्यावर लहानगी पीहू तो मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करते. परंतु कपाटात उंचावर मोबाइल असल्यामुळे ती तो मिळवण्यास असमर्थ ठरते. या दरम्यान अनेकदा पीहू आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्नदेखील करते. आईच्या चेहर्‍याला मार लागल्याचे पाहून पीहू त्यावर काळजीपूर्वक औषधदेखील लावते. पुन्हा काही वेळाने मोबाइल खणाणतो, यावेळी मात्र पीहू फूटपट्टीच्या मदतीने मोबाइल मिळवते आणि फोनवर आपल्यावडिलांशी बोबड्या भाषेत बोलते. वडील पीहूला तिच्या आईला म्हणजेच पूजाला  'सॉरी' बोलायला सांगतात. पण, आई झोपली आहे असं पीहू वडिलांना सांगते. सोबतच वडील फोनच्या स्पीकरवर पूजाला त्याचाकडून चुकून चालू राहिलेली इस्त्री बंद करायला सांगतो. एकंदरच एकट्या घरात गंभीर वातावरण असते. ही नाट्यमयता मोठ्या पडद्यावर पाहणे थरारक आहे. कारण, एकट्या घरात दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते याचे समर्पक चित्रण दिग्दर्शकाने अत्यंत हुशारीने केले आहे.
 
सिनेमाचं पार्श्र्वसंगीत कौतुकास पात्र ठरेल असं आहे. सिनेमात गाण्यांची तशी विशेष गरज नव्हतीच. नेमके हेच भान दिग्दर्शकाने राखले आहे. पण सिनेमात मायराने म्हटलेली एक कविता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साराला 'केदारनाथ'ची प्रतीक्षा!