Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज जरांगे : 'माझ्याशी बोलल्याशिवाय अध्यादेश काढायचा नाही, नाहीतर काना-मात्रामध्येही फसवता'

eknath shinde manoj jarange
, सोमवार, 15 जानेवारी 2024 (11:20 IST)
"19 जानेवारीला विधिमंडळाचं अधिवेशन बोलवा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा करा," असं आवाहन मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला उद्देशून केलंय. मात्र, "चर्चा केल्याशिवाय अध्यादेश नको, कारण ते तिकडे काहीही लिहितील, तसं चालणार नाही. किंबहुना, माझ्याशी चर्चा केल्याशिवाय अध्यादेश काढायचा नाही, नाहीतर ते कानामात्रामध्येही फसवतात," असंही जरांगे म्हणाले.
 
जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनासंबंधी आणि सरकारसोबतच्या चर्चेसंबंधी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
 
जरांगे म्हणाले की, "जिथे नोंदी सापडल्यात, त्या ग्रामपंचायतीत यादी लावा, म्हणजे लोकांनाही कळेल. नोंदी मिळालेल्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र द्या."
 
मुंबईतील आंदोलनाबाबत जरांगे म्हणाले की,"काहीही होवो 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं. चर्चा होत राहतात, तो वेळकाढूपणाही आहे, त्यामुळे मराठा समाजानं मुंबईला जायचंय. मराठे मुंबईला गेल्याशिवाय सरकार सूतासारखं सरळ होत नाही."
 
"ज्याची नोंद मिळाली, त्याच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या, तरच तुमचं-आमचं जमेल, नाहीतर नाही. एखाद्याची नोंद सापडली आणि अमूक माणूस सोयरा आहे, असं तो सांगत असेल आणि तसं नसेल, तर त्याची चौकशी व्हावी, या मताशी आम्हीही सहमत आहोत," असंही जरांगे म्हणाले.
 
जरांगेचं 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण
मराठा आरक्षण देण्याच्या ‘24 डिसेंबर’ या अल्टिमेटमच्या एक दिवस आधी मनोज जरांगे यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी जरांगे यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली.
 
आमरण उपोषणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून पायी चालत मुंबईला पोहोचणार असल्याची जरांगेंनी घोषणा केली.
 
याआधी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी दुसऱ्यांदा उपोषण केलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आपण मराठ्यांना आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं होतं.
 
पण अजूनही या मुद्द्यावर तोडगा निघल्याचं दिसत नाहीये.
 
त्यामुळे ‘आम्ही शांततेत आंदोलन करू, पण आंदोलन होणारच,’ असा मनोज जरांगे यांनी पवित्रा घेतला आहे.
 
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे.
 
बीडमधील भाषणात जरांगे यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.
 
बीडमधील ‘इशारा’ सभेत मनोज जरांगेंनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. -
 
बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा आमच्यावर खोटा डाग लावला आणि मराठा बांधवांना तुरुंगात टाकण्यात आलं.
मराठ्यांनी शांततेत रॅली काढल्या. कधीही जाळपोळ केली नाही.
 
मराठ्यांची लेकरं आत्महत्या करतायत, कुणबी नोंदी सापडल्या तरीही सरकार आरक्षण देत नाहीये.
20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार.
आंदोलनासाठी स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघाणार.
वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कूच करतील.
जर कुणी जाळपोळ केली आणि गोंधळ घातला तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. सरकारला नको पण पोलिसांना सहकार्य करा.
जर पोलिसांनी जाणूनबुजून मराठ्याच्या तरुणाला ताब्यात घेतलं तर, फक्त पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन बसा.
सरकारशी आम्ही सगळ्यांसमोर चर्चा करणार, भींतीआड चर्चा होणार नाही.
कायद्याच्या अधीन राहून आम्ही मुबंईत आमरण आरक्षण करणार.
मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांना विनंती आहे सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी
आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार.
देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार.
पोरांना अटक झाली तर मराठ्याच्या महिलांनी आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा.
सरकारला दहा बारा दिवस मिळतायत ते बघा, एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही.
जरांगेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ABP माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.
 
मुख्यमंत्री म्हणाले, “मराठा आरक्षणाविषयी 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टाकडून क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी होणार आहे. ही एक मोठी दिलासादायक गोष्ट आहे. सुनावणी दरम्यान मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी आपल्या वकिलांची फौज असणार आहे.
 
"या सुनावणीदरम्यान आधीच्या त्रुटी दूर केल्या जातील. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. महाविकास आघाडी सरकारने आधीच्या सुनावणीवेळी कोर्टात भक्कम पुरावे मांडले नव्हते. पण आता आमच्याकडून फुलप्रूफ बाजू मांडली जाईल.”
 
 
तसंच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सर्वांनी संयम राखावा. जातींमध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
 
जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं प्रत्त्युत्तर
मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यास आमचा विरोध नसल्याचं छगन भुजबळ यांनी पुन्हा म्हटलं आहे.
 
“मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. तेच आम्ही आधीपासून म्हणत आहोत. त्याला आमचा कधीही विरोध नव्हता. गायकवाड सिमितीच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाचं विधेयक आणलं. त्याला आम्ही पाठिंबा दिला. पण सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. आता सुप्रीम कोर्टाने क्युरिटीव्ह पिटीशन दाखल करून घेतली आहे. हा मोठा दिलासा आहे. यात जुन्या त्रुटी दूर केल्या जातील”
 
याशिवाय भुजबळ यांनी जरांगे यांच्या बोचऱ्या टीकेला प्रत्त्युत्तरही दिलं. आपण अशा कोल्हेकुईला घाबरत नाही. जरांगेंनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे, असं भुजबळ म्हणाले.
 
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन
 
मराठा समाज कसा मागास आहे हे सांगणारे महत्वाचे पुरावे सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आरक्षण टिकू शकलेलं नाही. मागील सरकारने न्यायालयीन प्रक्रिया गांभीर्याने घेतली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (19 डिसेंबर) विधिमंडळात मराठा आरक्षणावर बोलताना म्हटलं.
 
“मागील सरकारमध्ये मराठा समाजाचं शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 33% प्रतिनिधीत्व असल्याचं सांगितलं. ते मराठा समाज मागास नसल्याचं एक महत्वाचं कारण ठरलं. बापट आयोगाने ढोबळपणे निष्कर्ष काढले. गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टापुढे नीट मांडला नाही.
 
महायुती सरकारने क्युरिटीव्ह पीटीशन दाखल केलं आहे. मागील सरकारच्या काळात ज्या चुका झाल्या त्या या दरम्यान टाळल्या जातील,” असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
मराठा समाजातील बांधवांना आम्ही सरकार म्हणून आश्वस्त करतो की, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
 
राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये सादर करेल. त्यानंतर या अहवालाचं अवलोकन केलं जाईल. हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असं त्यांनी म्हटलं.
 
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. सरकारच्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे. कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे याची काळजी सरकार घेत आहे पण विरोधकांनीही याची काळजी घेतली पाहिजे.
 
‘मुख्यमंत्र्यांचं भाषण वेळकाढूपणाचं’
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करताना म्हटलं की, समस्त मराठा समाजाची फसवणूक करणारं मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं. मराठा समाजाच्या आरक्षणापासूनचा विषय होता. त्याचं ठोस उत्तर सरकारने दिलेले नाही. त्याला कालमर्यादा नाही. आजचं उत्तर म्हणजे खोदा पहाड निकला चूहा.
 
वडेट्टीवार यांनी पुढं म्हटलं की, विशेषरुपाने ओबीसी समाजासाठीही ठोस चर्चा अपेक्षित होती. धनगर समाज, ओबीसी समाजासाठीच्या जुन्या योजना ज्या मविआ सरकारच्या काळात होत्या त्याच त्यांनी सांगितल्या.
 
गेल्यावेळेस शेवटची तारीख आहे असं सांगितलं होतं. आता पुन्हा वेळ मारून नेल्यासारखं केलं आहे. त्यांनी केलेलं भाषण वेळकाढूपणाचे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.
 
इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणावर भाष्य केलं नाही. आमचं सरकार असतानाही सर्वोच्च न्यायालयात तेच वकील होते, त्यामुळे ते जे काही म्हणाले ते खोटं आहे, असंही त्यांनी म्हटलं.
 
सवलतींवर बोलून मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ मारुन नेल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
 
फेब्रुवारीची मर्यादा मान्य नाही- मनोज जरांगे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं.
 
मनोज जरांगे यांनी या घोषणेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुख्यमंत्र्यांची ही डेडलाईन आम्हाला मान्य नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं.
 
मनोज जरांगे म्हणाले की, 1967 पासून ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते एक चांगलं झालं.
 
कारण नातेवाईकांना आरक्षण देण्याचं जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही.
 
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडताना राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत देत, त्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला होता.
 
आता 24 डिसेंबरला आठवडा उरला असल्यानं सगळ्यांच्या नजरा राज्य सरकार आणि मनोज जरांगे या दोघांच्याही भूमिकांकडे लक्ष लागलं आहे.
 
या निमित्तानं आपण मनोज जरांच्या आंदोलनापासून आतापर्यंत कोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या, हे आपण पाहूया.
 
अंतरवाली सराटीत लाठीमार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असताना, एक सप्टेंबर रोजी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर तिथं गोंधळ निर्माण झाला आणि त्यातून आंदोलकांसह पोलीसही जखमी झाले.
 
या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले. राज्य सरकारविरोधात मराठा समाजातून टीका सुरू झाली. अगदी पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासह जमावबंदीचे आदेश आणि झालेल्या लाठीमाराच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं.
 
मात्र, लाठीमाराच्या या घटनेनं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण राज्यभर पोहोचलं.
 
शरद पवार, रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊ लागले.
 
पुढे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाठीमाराच्या घटनेबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितलं की,
 
“जालना आंदोलनात हिंसक जमावाकडून केलेल्या दगडफेकीत 79 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. पोलीसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला त्यात 50 आंदोलक जखमी झाले.”
 
आमरण उपोषण आणि हिंसक घटना
या लाठीमाराच्या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण आणखीच तीव्र केलं. गावागावात कुणा राजकीय नेत्याला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना येण्यासही मनाई करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं. त्यानंतर या आंदोलनानं आक्रमक रूप धारण केलं.
 
काही ठिकाणी जाळपोळीच्या, तर बीडसारख्या ठिकाणी राजकीय नेत्यांची घरं जाळण्याचा प्रकार घडला. या प्रकारात मराठा आरक्षणाचे आंदोलक नव्हते, असे मनोज जरांगे आणि नंतर राज्य सरकारनेही म्हटलं.
 
मनोज जरांगेंनी आधी 40 दिवसांची आणि नंतर आमरण उपोषणानंतर 24 डिसेंबरपर्यंतची मुदत राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिला.
 
जरांगे-भुजबळ शाब्दिक युद्ध
मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिल्यानंतर राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. ठिकठिकाणी सभा घेत मराठा आरक्षणासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
 
या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर आणि मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर टीकासत्र सुरू केलं.
 
परिणामी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा दावा करत राज्यभर ओबीसी समाजाच्या सभा घेण्यास भुजबळांनी सुरुवात केली. यातून भुजबळ विरुद्ध जरांगे हा वादही वाढू लागला.
 
भुजबळांना स्वपक्षीयांनी आणि राज्य सरकारमधील इतर सहकारी पक्षातील नेत्यांनीही आवाहन केलं की, अशा प्रकारची भाषा वापरून वाद वाढेल अस बोलू नये.
 
मात्र, त्यानंतरही भुजबळांनी घेतलेल्या सभांमध्ये मनोज जरांगेंवर त्यांनी टीका केली आणि परिणामी जरांगेंनी भुजबळांवर टीका सुरूच ठेवली.
 
कुणबी प्रमाणपत्र वाटप
मनोज जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. या मागणीला ओबीसी समाजातून विरोध करण्यात आला.
 
मात्र, दुसरीकडे राज्य सरकारने जिल्हानिहाय मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी जातीचे असल्याचं सिद्ध करणारे कागदपत्रं आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवातही केली.
 
16 डिसेंबरला गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (16 डिसेंबरपर्यंत) राज्यातील 50 लाखांहून अधिक जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
 
राज्य सरकारच्या या आकडेवारीवर मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून ते तसूभरही मागे हटले नाहीत.
 
महाजन आणि भुमरे यांचं निमित्तानं राज्य सरकारकडून जरांगेंना शिष्टमंडळ भेटलं खरं, पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
 
त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनात विधानसभेत काय माहिती देतात आणि त्यानंतर मनोज जरांगे आपली भूमिका काय ठरवतात, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकरसंक्रांत : 'संक्रांत आली' म्हणजे 'संकट आलं' असं का म्हणतात? संक्रांत शुभ की अशुभ? सत्य काय?