Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्यामची आई - रात्र बत्तिसावी

श्यामची आई - रात्र बत्तिसावी
कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे; परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते; भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा.
 
सावकाराचा माणूस! वडील त्याची बरदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेविली. "कढी कर व कढीत कढीलिंब टाक, म्हणजे वास लागेल." अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती; तरी शेजारून आई घेऊन आली. चहापानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली; परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर! श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास २५ रुपये दंड झाला, असे मी वाचले होते! शेतकरी! शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम! साऱ्या खुशालचेंडूंना पोसणारा तो जणू पशू! असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो? मित्रांनो! हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे, कावळे चालतील; घरात पोपट-मैना चालतील; परंतु हरिजन खपणार नाही! पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल! परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य असे, कोठून करवून घेईल, याचा नेम नसतो.
 
माझे वडील शेतावरून आले. "तुमचे स्नान वगैरे झाले का?" असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो 'होय' म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्या जवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. "बरे, मी स्नान करतो; लौकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या." असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, "त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणून द्यायचा होतास." आई म्हणाली, "सारे काही दिले. त्याचे धोतरही धुऊन वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे येथून लवकर." आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील, खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लौकरच देवळातून परत आले. "उठा, वामनराव, हातपाय धुवा." असे वडील त्यांना म्हणाले. "या, बसा येथे. सोवळे नसले तरी चालेल. काही हरकत नाही." असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हांस सोवळ्या- ओवळ्यासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदोउदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्त्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्नमुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने; पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने; ह्या खोट्या कुलाभिमानामुळे; आंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे; भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्टकचेर्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे; कर्ज उरावर बसत होते, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे! गड्यांनो! तुमच्या बायकामाणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल, तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच, तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. "पुरुषोत्तम! छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील, असा म्हण." वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला; परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय मोठे नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते; आढ्यताखोर व दिमाखबाज होत चालले होते. "संकोच नका करू वामनराव; भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीभर." असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल! चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली. "मग काय, भाऊराव! व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज पंचाहत्तर रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला म्हणून आलो." वामनराव बोलू लागले. "हे पाहा, वामनराव! दहा मण भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून पंचवीस रुपये तुमच्यासाठीच बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी चार शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत-मिळवती होऊ देत-एक यंदा प्रीव्हिअसमध्ये गेला आहे. हे पाहा, वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात? तेही बाहेर पडतात." माझे वडील अजीजी करून सांगत होते. "ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत; फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो! सावकारांचा वसूल आला नाही, तर आम्हांला तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हांलाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या." वामनराव रागाने, बेमुवर्तखोरपणे बोलत होता. तो तरी काय करील? तोही गुलामच! "वामनराव! काय सांगू तुम्हांला? घर ते काय? अहो केंबळी घर. मापाच्या भिंती! तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातांतल्या पाटल्या विकाव्या लागल्या!" वडील शरमिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यांतील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता. "घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका." असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुऊन ती बाहेर आली. तिच्या डोळ्यांतून शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, "या ओटीवरून चालते व्हा! बायको विका, असे सांगायला तुम्हांला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हांला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा, की घरादाराचा लिलाव करा. परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल. दवंडी पिटा, जप्ती आणा. परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका." "ठीक आहे. आम्ही तरी त्याचीच वाट पाहात आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली, तर मी वामनराव नव्हे! एका बाईमाणसाने, भाऊराव, आमचा असा अपमान करावा का?" वामनरावांनी वडिलांस विचारिले. "तू घरात जा. जातेस की नाही?" माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता पंचवीस रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. "तुम्हां बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हांला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो! त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे, एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडीगुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना?" वडील आईला बोलू लागले. "पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीसफिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव, आपणही मोलमजुरी करू, मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला." आई भावनाविवश झाली होती. "बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली, म्हणजे समजेल सारे!" असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, "आई! रडू नकोस. तू रडलीस, म्हणजे आम्हांला रडू येते. आई! तू सांगशील, ते काम आम्ही करू. रडू नकोस, आई!"
 
लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती! फुले झाडाला आधार देत होती! करुण असे ते दृश्य होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्यामची आई - रात्र एकतिसावी