Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय  संस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.
 
जगभरातील अखिल मानवजातीच्या निरोगी शरीरासाठी, संस्कारक्षम व संतुलित मनासाठी आणि सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी भारताने अखिल विश्वाला दिलेली ही अमृतमय पर्वणीच म्हणावी लागेल. 
webdunia
सुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार  मोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात   उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.
webdunia
आज जन्मताना आणि मरतानाही माणसाला आय.सी.यू (कृत्रिम श्वासावर) ठेवावे लागते आहे. ही आजच्या माणसाच्या आरोग्याची शोकांतिका आहे. पूर्वी माणूस घरी जन्मायचा आणि घरीच मरायचा परंतु आज तसं राहिलं नाही. जन्मही दवाखान्यात आणि मृत्यूही  दवाखान्यात, अशी परिस्थिती होऊन बसली आहे. या सर्व व्याधींवर, समस्यांवर योगासने, प्राणायम, धनधारणा, मन:शांती, विपश्यना हेच रामबाण उपाय उरलेले आहेत. अगदी प्राचीन काळी देखील गौतम बुद्धांनी आपल्या जीवनशैलीत, तर अलीकडील स्वामी विवेकानंदांनी देखील हेच मार्ग अवलंबिले होते. यावरून तरी आपण या योगामृताचे महत्त्व जाणायला हवे आहे.
webdunia
योग हा विश्वातील कोण्या एका जाती-धर्मासाठी नसून तो सर्वासाठी आहे. याला फक्त एकच जात माहिती आहे ती म्हणजे मानव-जात. मग इथे मानव जातीतील लिंगभेदाला देखील थारा नाही. 
 
काही राजकीय मंडळी आपली मतांची पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिकतेचा रंग देऊ पाहात आहेत. सूर्यनमस्कारावरून राजकीय राळ उठविली जात आहे. सूर्य काही कोण एका विशिष्ट धर्मासाठी नाही. अगदी इस्लाम धर्मामध्ये नमाज पठण्यासाठी बसण्याची जी पध्दत आहे ती याच योगशास्त्रातील वज्रासनावर आधारित आहे. आणि वज्रासनाचे मानवीयं आरोग्याला काय फायदे आहेत ते सर्वच धर्मियांना माहीत आहेत. त्यामुळे अखिल मानवीय जातीला आता योगाचे महत्त्व कळून चुकले आहे. म्हणून योगामृताने अवघे विश्व व्यापून टाकले आहे. 
 
हरिश्चंद्र खेंदाड 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जांभई का येते?