Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्यामची आई - रात्र पस्तिसावी

श्यामची आई - रात्र पस्तिसावी
आईचे चिंतामय जीवन
"मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! "दत्तगुरू, दत्तगुरू" म्हणत गेला. "ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो!" असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा; तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे, असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. दोन-तीन महिने शाळा बंद राहील, असा अंदाज होता. मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुडपक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळ्या, कोठे वेदपठन ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल, अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे- "गोकुळात खाशी तू दही दूध लोणी परब्रम्ह होतासि नेणे परि कोणी एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी" हे गाणे म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली, "कोण?" आईने विचारले. "मी. श्याम." असे उत्तर दिले. "श्याम! आला रे माझा बाळ; आल्ये, हो!" असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरिले. "देवांना नमस्कार कर. मी त्यांना गूळ ठेवत्ये. हो, आधी, बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते! त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो, की नाही?" असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली "म्हटलं, श्याम आला, हो, आपला, आताच आला!" ते पाय धुऊन घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. "श्याम! गणपतीवर आवर्तने करीत होतो. आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला!" असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले. "नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज." आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे, असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. किती तरी वेळा रात्री असताना "मी माझ्या आईच्या कुशीत आहे," हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत, असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली, ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, "तुला कवठ आवडते, रे?" मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला होता तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही. म्हणून हात हलवीत परत आलो, असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो, असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो, तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला. आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती. "त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल, म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल?" असे वडील म्हणाले. "तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात; तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही." असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती. "त्या वेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसांत नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हां मायलेकरांना पसंत पडले नाही." वडील पुन्हा म्हणाले. "पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो येथून जाईल, हो. तो घरबशा होणार नाही, खायला काळ व भुईला भार होणार नाही." आई म्हणाली. "तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल, म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल." वडील आपलेच म्हणणे पुढे चालवीत होते. शेवटी माझ्याने राहवेना; मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो, "भाऊ! मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही, तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता, तरी मी तेथेच राहणार होतो, जाण्यायेण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांस तेथे राहू देत ना, म्हणून आलो, मी उद्याच जातो. आई! उद्याच मी निघतो." "त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे. मग जा हो श्याम! माझे वेडीचे ऐक." आई म्हणाली. "मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई! चिंता करू नको. देव तारी, त्याला कोण मारी? ज्याला जगवावयाचे, त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील!" मी म्हटले. "तू तरी त्यांचाच ना मुलगा! तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल! जा, बाबांनो! कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले-माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही, काही समजत नाही, चांगली सोन्यासारखी पोरे नेतो. आम्हांला रडावयाला राखतो!" असे आई रडत म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, "माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही, तर महिन्याभराने जावेच लागणार ना? तू परवानगी दे." शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका कधी धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते. स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार! बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो! आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन! त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली! आईला मी त्या वेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवावयाचे होते. दुसरे काय!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्यामची आई - रात्र चौतिसावी